*******प्रवीण दाभोळकर*****
9773770507
दहीहंडी हा काही खेळ नाही, ती आपली संस्कृती आहे. दहीहंडीला आपण आपली संस्कृती मानतो, तर त्या संस्कृतीची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. एकजूट, एकशक्ती, एकच लक्ष्य या समूहगुणांचे प्रतीक म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. यापैकी एकाचाही अभाव असेल, तर दहीहंडीचा रंग फिका होतो. सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदाने समूहाचे हे गुण आपल्या व्यक्तिगत जीवनातही अवलंबायला हवेत. न्यायालयाचा निर्णय आणि गोविंदांच्या भावना यांचा मध्यबिंदू
सांधणारा निर्णय सर्वानुमते मान्य व्हायला हवा. काही दिवसांवर आलेली दहीहंडी, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडी पथकांत सहभागी होण्यासाठी घातलेली 18 वर्षेवयाची व दहीहंडीसाठी घातलेली 20 फूट उंचीची मर्यादा यामुळे सर्वच दहीहंडी पथके संभ्रमात पडली आहेत. मात्र आपल्याला हव्या त्या पध्दतीने दहीहंडी साजरी करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची गोविंदांची तयारी आहे.



9773770507
दहीहंडी हा काही खेळ नाही, ती आपली संस्कृती आहे. दहीहंडीला आपण आपली संस्कृती मानतो, तर त्या संस्कृतीची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. एकजूट, एकशक्ती, एकच लक्ष्य या समूहगुणांचे प्रतीक म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. यापैकी एकाचाही अभाव असेल, तर दहीहंडीचा रंग फिका होतो. सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदाने समूहाचे हे गुण आपल्या व्यक्तिगत जीवनातही अवलंबायला हवेत. न्यायालयाचा निर्णय आणि गोविंदांच्या भावना यांचा मध्यबिंदू
काही दिवसांवर आलेली दहीहंडी, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडीत सामील होणाऱ्यांवर घातलेली 18 वर्षे वयाची व दहीहंडी बांधण्यावर घातलेली 20 फूट उंचीची मर्यादा यामुळे सर्वच दहीहंडी पथके संभ्रमात पडली आहेत. प्रत्येक दहीहंडी पथकामागे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दहीहंडीच्या दिवशी येण्याजाण्याचा खर्च, गोविंदांचे जेवणखाण, टी-शर्ट, आपत्कालीन व्यवस्था यांचा खर्च दहीहंडी मंडळे करत असतात. गेल्या काही वर्षात दहीहंडी पथकांच्या प्रत्येक थरामागे लाखो रुपयाची उधळण होत गेली. वर्षागणिक आयोजकांनी थर वाढवत हंडी उंच उंच नेली. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पथकांना पैसा, प्रसिध्दी मिळत गेली. उंचावरच्या थरांमुळे सरावादरम्यान व दहीहंडीच्या दिवशी होणाऱ्या अपघातांमध्येही वाढ होत गेली. यंदा सरावादरम्यान झालेला बाल गोविंदांचा मृत्यू, त्यात बालहक्क आयोगाने घातलेले लक्ष, प्रसारमाध्यमांनी दिलेली प्रसिध्दी यामुळे सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला. उच्च न्यायालयानेही दहीहंडीवर कडक निर्बंध घातले आहेत. ‘कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण आतापर्यंत होत आली तशीच दहीहंडी साजरी होणार’ असा बुचकळयात टाकणारा पवित्रा दहीहंडी समन्वय समितीने घेतला आहे. एकामागोमाग घडत गेलेल्या अशा सर्व घटनांमुळे दहीहंडीच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, एवढे मात्र नक्की…
दहीकाला हा महाराष्ट्रातील जनसमूहाचा उत्सव आहे. श्रीकृष्णाने गायी चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केलाव सर्वांसह त्याचे भक्षण केले,अशी कथा सांगितली जाते. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. यांचे खेळगडी जेव्हा घरोघरी जातात, तेव्हा त्यांच्या डोक्यावर घागरी भरून पाणी ओतले जाते. कोणी कोणी आपल्या घरापुढे शक्य तितक्या उंचीवर दह्याची हंडी बांधत व हंडीखाली मानवी मनोरा उभा करून त्यावर चढून एखाद्या लहान मुलाने आपल्या मुठीने ती हंडी फोडावी, अशी या सणाची पार्श्वभूमी आहे. पूर्वापार हा सण म्हणूनच साजरा केला जात आहे. पण गेल्या दशकभरात दहीहंडीला ‘इव्हेंट’चे स्वरूप मिळाले आहे. दहीहंडीमध्ये पैशांची गुंतवणूक झाली, ग्लॅमर मिळाले, गोविंदांचा उत्साह वाढला. त्यातूनच दहीहंडीची साहसी खेळात गणना व्हावी यासाठी प्रयत्न झाले.
दहीहंडीची तयारी
खास दहीहंडी उत्सवानिमित्त शरीरयष्टी बनविण्यासाठी अनेक तरुण व्यायामशाळांकडे वळले आहेत. दहीहंडीच्या थराचा टिकाव लागण्यासाठी नियमित व्यायाम व खास खुराकही या मंडळींनी चालू केला आहे. खालच्या थराला असणाऱ्या गोविंदांची उंचीच साधारणत: पाच ते सहा फूट एवढी असते, त्यात उच्च न्यायालयाने दहीहंडीसाठी आखलेली वीस फुटाची मर्यादा, याने जेमतेम तीन ते चारच थर लागू शकतात.
कोर्टाच्या निर्णयाचा आम्हाला अवमान करायचा नाही, पण सरकारने आमची बाजू विचारात न घेतल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दहीहंडी त्याच उत्साहात साजरी होणार आणि जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला सरकारच सर्वस्वी जबाबदार असेल. बाळा पडेलकर अध्यक्ष, दहीहंडी समन्वय समिती
दहीकाला उत्सवाला काही दिवस उरले असताना दहीहंडीचा थर वीस फुटांपर्यंत असावा आणि सहभागी गोविंदांचे वय किमान 18 वर्ष असावे असा ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निकालामुळे जवळजवळ सर्वच गोविंदा पथकात नाराजीचे वातावरण आहे. गेले महिना-दोन महिने सर्वच गोविंदा पथकातील पुरुष-महिला गोविंदा पथकांनी दहीहंडीचा कसून सराव केला आहे. दहा वर्षापासून ते 35 ते 40 वयोगटातील गोविंदांनी आपला कामधंदा सांभाळून तालमीला हजेरी लावतात. दहीहंडीसाठी इच्छुक असलेल्या गोविंदांची फिटनेस टेस्ट घेतली जात नसली, तरीही यातील बहुतांश मुले-मुली कबड्डी, खो खो अशा खेळांशी संबंधित असतात. त्यामुळे त्यांनी शरीराचा चांगला फिटनेस राखलेला असतो. त्यांच्याकडून शिस्तबध्द पध्दतीने दहीहंडीच्या थरांचा नियमित सराव करून घेतला जातो. येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या पालकांशी वैयक्तिक संवाद साधला जातो, त्यांना विश्वासात घेतले जाते, त्यानंतरच मुलांना पथकात सामील केले जाते.
दहीहंडीतून समाजकार्य
माझा उत्सवाला विरोध कधीच नव्हता आणि नसेल. पण न्यायालयाच्या आदेशाच्या आम्ही विरोधात जाणार नाही. दहीहंडी उत्सव म्हणून खूप चांगल्या पध्दतीने साजरा होईल, पण न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच! आमदार प्रताप सरनाईक
गेल्या 25 ते 30 वर्षांपासून अनेक मंडळांची गोविंदा पथके आहेत. ‘दहीहंडींच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवरच मोफत व्यायामशाळा, रक्तदान शिबिर, वह्यावाटप असे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे होत असतात. दहीहंडीच्या दिवशी मिळालेल्या पैशांवर या कार्यक्रमांची आखणी ठरलेली असते. आम्ही जर चारच थर लावले, तर आमच्या मंडळांचे अर्थार्जन कसे होणार? आणि पुढच्या वर्षभरातील कार्यक्रम कसे होणार? याची आम्हाला चिंता वाटते आहे’ असे गोविंदा पथकांचे म्हणणे आहे. दहीहंडी सणावर अवलंबूनच आम्ही दर वर्षी खर्च करत नियमित चाललेल्या उत्सवात कुठे खंड पडू नये, असे गोविंदा पथकांना वाटते.
खेळाडूंच्या नजरेतून दहीहंडी..
फक्त चार थर लावण्याची अट म्हणजे दहीहंडीतील थरार काढून घेतल्यासारखे आहे. त्यामुळे दहीहंडी बंद पाडण्यासाठी हे चाललेय का? असे अशी शंका काही गोविंदा व्यक्त करतात. असे झाले तर दहीहंडीचा उत्सव कालांतराने बंद होण्याची शक्यताही ते व्यक्त करतात. स्पेनसारख्या देशात उंचच उंच मनोरे रचण्याची एक शिस्तबध्द परंपरा आहे. त्यातले त्यांचे कौशल्य वादातीत आहे. म्हणूनच गेली काही वर्षे त्यांना दहीहंडीसाठी खास निमंत्रित केले जाते.
दहीहंडीच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी झाल्याचे चित्र आपण प्रसारमाध्यमांतून पाहतो. पण हे खूप चुकीच्या पध्दतीने दाखविले जात असते. मात्र नियमित कसून सराव, तसेच शिस्तबध्द पध्दतीने मनोरे रचल्यास अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, याची खात्री मोठमोठया पथकांकडे पाहिले तर पटेल. दहीहंडीच्या थरांवरून कोसळणाऱ्या गोविंदांपेक्षा त्या दिवशी दुचाकीवरून फिरताना होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त असते. पण अशा अपघातग्रस्तांची संख्याही गोविंदांच्या अपघातात गृहीत धरली जाते. पर्यायाने गोविंदाच्या अपघातात वाढ असे चित्र सर्वसामान्य घरांपर्यत पोहोचत असते, असा गोविंद पथकांचा दावा आहे. प्रसारमाध्यमांतून झालेल्या या प्रसारामुळे या वर्षी प्रत्येक पथकात गोविंदांची संख्या 40 ते 50 ने घटली आहे. खरे तर, सर्वच साहसी खेळांमध्ये कमी-जास्त प्रमाणात जीवाला धोका असतो. पण यातील साहसामुळेच या खेळाची वेगळी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते.
राज्य सरकारचा आम्ही धिक्कार करतो. मराठी सणांवर घालण्यात आलेला हा घाला आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचे पालन सर्वत्र केले जाईल. उत्सव नेहमीप्रमाणेच जल्लोशात साजरा होईल, पण मी स्वत: दहीहंडीत सहभागी नसेन.
आमदार बाळा नांदगावकर
आमदार बाळा नांदगावकर
”निव्वळ पैसा मिळविणे हा दहीहंडी पथकांचा हेतू कधीच नसतो, तर या उत्सवामुळे अनेक माणसे एकमेकांना जोडली जात असतात, आपली संस्कृती साऱ्या जगाला दिसून येत असते” असे मत गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले. वरळीतील एका दहीहंडी पथकाचे ज्येष्ठ प्रशिक्षक म्हणाले की, ”मी 1990पासून दहीहंडीच्या थरांवर होतो. तेव्हा आम्ही सहा थरांची सलामी देऊन खाली उतरायचो. तिथपासून पुढची 12 ते 15 वर्षे आम्ही सहा थरांवरच मर्यादित होतो. पण गेल्या पाच वर्षांत जोरदार स्पर्धा वाढली आहे. राजकारणी, सेलिब्रेटी यांच्या हस्तक्षेपामुळे दहीहंडीचा इव्हेंट झाला आहे. एक थर जास्त लावला तर राजकारणी लाखभर रुपये मोजायला तयार असतात, तेवढाच मानमरातबही प्रसिध्दीमाध्यमांमुळे त्या दिवशी आम्हाला मिळत असतो. आपण किती थर लावू शकतो याची मर्यादा प्रत्येक संघाला व त्यांच्या प्रशिक्षकाला माहीत असते. त्यामुळे ऐन वेळी उत्साहाच्या भरात एखादा थर वाढविणे हे केव्हाही चुकीचेच ठरते.”
न्यायालयाने सुवर्णमध्य साधावा
उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि काही दिवसांवर आलेली दहीहंडी यामुळे दहीहंडी समन्वय समिती गोंधळात पडली आहे. ”आम्हाला कोर्टाचा अवमान करायचा नाही, पण गोविंदांच्या भावना लक्षात घेऊन कोर्टाने अध्यादेश काढत आपला निर्णय मागे घ्यावा” असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर पत्रकार परिषदेत म्हणाले. ”आम्ही गेली अनेक दिवस सरकार दरबारी फेऱ्या मारत आहोत. सरकारने आमची बाजू कोर्टासमोर मांडण्याचे आश्वासन दिले होते. पण कोर्टाच्या निर्णयामुळे सरकारने विश्वासघात केल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे दहीहंडीचा सण मोठया जल्लोशात साजरा होणार व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील” असा इशाराही पडेलकर यांनी दिला. तेव्हा, ‘मायबाप सरकारने पुन्हा एकदा आमची बाजू कोर्टासमोर मांडावी आणि योग्य तो निर्णय मिळावा, अशी समन्वय समितीने विनंती केली आहे.
काही आयोजकांची माघार
‘दहीहंडीला खेळाचा दर्जा द्या’ असे सांगणाऱ्या काही राजकारण्यांनी सरावादरम्यान झालेल्या मृत्यूंमागचे गांभीर्य ओळखून आपल्या दहीहंडीचे आयोजन ऐनवेळी रद्द केले आहे. पण यामुळे दहीहंडी सणावर काही परिणाम होणार नाही. ”दहीहंडीमुळेच आज अनेक आयोजक मोठे झाले आहेत, यशस्वी राजकारणी झाले आहेत. पण आज दहीहंडीला त्यांची गरज असताना त्यांनी आयोजकत्व रद्द करणे चुकीचे आहे,” असे मत दहीहंडी समन्वय समितीने व्यक्त केले आहे. या आयोजकांवर बहिष्कार टाकण्याचा विचार समिती करत आहे.
दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला, तर त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होईल. शाळांमध्ये हा खेळ शिकविला गेला, तर मुलांमध्येही या खेळाबद्दल आत्मीयता निर्माण होईल. वर्षातून एकदा अनुभवायला मिळणारे हे चित्तथरारक क्षण सातत्याने अनुभवायला मिळाले, तर त्यातील खेळाडूंनाही प्रोत्साहनच मिळणार आहे. याच माध्यमातून खेळाडूंना नोकऱ्या मिळाल्या, तर या माध्यमातून एक चांगली पिढी घडू शकते असा विचार दहीहंडीत वर्षानुवर्षे सहभागी होणारी पथके हिरिरीने मांडत आहेत.
वास्तवाकडे डोळेझाक नको
चांगले प्रशिक्षक व प्रशिक्षण नसलेल्या गोविंदा पथकांमध्येच अपघातांची संख्या जास्त असते, असे काही गोविंदांचे म्हणणे आहे. मुलांना सराव देणारे प्रशिक्षित असतात. किशोरवयीन व लहान मुलांमध्ये दहीहंडींचे आकर्षण आहे. दहीहंडीसाठी येणारी ही मुले स्वत:हून आलेली असतात की घरातील मंडळींचाही त्यांना पाठिंबा असतो, यामागे त्यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कितपत कारणीभूत असते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. क्षमतेबाहेरचे थर फोडण्याचा प्रयत्न करताना वरच्या थरावर असलेल्या बालगोविंदाच्या जिवाची बाजी लागत असते, याचा विचार करणेही गरजेचे आहे. उंचच उंच थर लावणाऱ्या आयोजकांनी गोविंदांच्या संरक्षणाची कोणती जबाबदारी घेतलेली असते? हे सर्वांसमोर येणे गरजेचे आहे. दहीहंडीला ग्लॅमर आल्याने पुढाऱ्यांचा उत्साह, दहीहंडीतील गुंतवणूक वाढल्याचे दिसून येते. आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी पुढारी दहीहंडीच्या गोविंदांचा वापर करतात का? आणि गोविंदा त्यांचे कळत नकळत समर्थन करत असतात का? गोविंदांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. दहीहंडीचा दिवस संपल्यावर पैसा, प्रसिध्दी आणि आनंद या गोष्टी गोविंदांना कमीअधिक प्रमाणात मिळालेल्या असतात. याचसोबत सुरक्षितताही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण दर वर्षी किती गोविंदा जायबंदी होतात, त्या अपघातग्रस्त मुलांशी गोविंदा पथकांचा वर्षभर संपर्क असतो का? त्यांच्या भविष्याबाबत विचार केला जातो का? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
दहीहंडी हा खेळ नाही. ती आपली संस्कृती आहे. दहीहंडीला आपण आपली संस्कृती मानतो, तर त्या संस्कृतीची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. एकजूट, एकशक्ती, एकलक्ष्य या समूहगुणांचे प्रतीक म्हणून गोविंदाकडे पाहिले जाते. यापैकी एकाचाही अभाव असेल, तर दहीहंडीचा रंग फिका होतो. सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदाने समूहाचे हे गुण आपल्या व्यक्तिगत जीवनातही अवलंबायला हवेत. न्यायालयाचा निर्णय आणि गोविंदांच्या भावना यात सुवर्णमध्य साधला जायला हवा.
आतापर्यंत सगळयाच गोविंदा पथकांनी यामध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करतो, पण गोविंदांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन कोर्टाने मध्यवर्ती भूमिका घ्यावी.
अरुण पाटील
प्रशिक्षक, माझगाव ताडवाडी