****प्रवीण दाभोळकर*****
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने व्हिजन 2020 आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनातील निर्माल्य व्यवस्थापन उपक्रम चालू आहे. यामार्फत पाने, फुले, केळीचे खांब अशा निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंना खत निर्मितीसाठी पाठविले जाते. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते.
अनंत चतुर्दशी…गणपती विसर्जनाचा दिवस. भक्तजनांच्या प्रचंड उत्साहात ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसह बाप्पा आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळचा मासुंदा तलाव परिसरही असाच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला. पोलिसांच्या देखरेखीत शिस्तबध्द पध्दतीने गणपती बाप्पा मासुंदा तलावाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. हे दृश्य जवळजवळ सर्वच विसर्जन तलावांजवळ पाहायला मिळत होते. समर्थ भारत व्यासपीठाचे कार्यकर्ते प्रचंड गर्दीतही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नववीत शिकणारी रेश्मा प्रभाकर वैराड ही विद्यार्थिनीही आपल्या आईसोबत समर्थ भारतने आयोजित केलेल्या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होती. ”पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा” असे या चिमुरडीचे सर्वांना सांगणे होते. रेश्मा व तिची आई आशा वैराड या महिला बचत गटाच्या माध्यमातून समर्थ भारत व्यासपीठशी जोडल्या गेल्या. सर्व भक्तजन गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत आकंठ बुडालेले असताना काही महिलांनी व त्यांच्या लहानग्यांनी निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करून उपस्थितांना पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देणे हे कौतुकाचे वाटले.

शिवाजी तलावाच्या बाजूलाच स्टॉल टाकला होता. तिथे उपस्थित कार्यकर्तेनिर्माल्यदान चळवळीत गणेशभक्तांना सामील होण्याचे आवाहन करत होते. ‘खत करू निर्माल्याचे, रक्षण करू पर्यावरणाचे’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधत होते. गणपती विसर्जनाच्या वेळी सोबत आणलेले निर्माल्य तलावात टाकून प्रदूषणाला आमंत्रण न देता ते समर्थ भारत व्यासपीठाला दान करावे, जेणेकरून खतनिर्मितीसाठी या निर्माल्याचा उपयोग करता येईल व पर्यावरण समतोल राखला जाईल, हा यामागचा पर्यावरण रक्षणाचा विचार आहे. दीड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या कालावधीत हे कार्य गेली चार वर्षे चालू आहे. मासुंदा तलावापासून समर्थ भारत व्यासपीठाच्या या उपक्रमाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी उपक्रम यशस्वी झाला. ठाणे महानगरपालिकेने त्याला मान्यता दिली. दुसऱ्या वर्षीपासून ठाणे महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र, सफाई कामगार यांच्या सोबतीने हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. शिवाजी तलावासोबतच मासुंदा तलावपाळी, रायलादेवी, आंबेघोसाळी, उपवन, कळवा गणेशघाट अशा ठाण्यात आठ ठिकाणी ठाणे मनपाचे सहा सफाई कामगार व बचत गटाच्या महिला यांना घेऊन समर्थ भारत व्यासपीठचे निर्माल्य व्यवस्थापनाचे कार्य चालते. या प्रत्येक ठिकाणी दोन ट्रक उपस्थित असतात, ज्यामध्ये विघटनशील व अविघटनशील असे निर्माल्याचे वर्गीकरण केलेजाते. समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालू आहे. कचराकुंडीत गोळा झालेले निर्माल्य ट्रकपर्यंत आणण्याचे काम ठाणे मनपाचे सफाई कामगार करतात. जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करून, थर्माकोल वापर टाळून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करावा, असे ठाणे मनपाचे सफाई कामगार कचराकुंडीजवळ येणाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते.

महिला बचत गटाचे योगदान
यापुढची जबाबदारी असते ती समर्थ भारत व्यासपीठ अंतर्गत चालणाऱ्या महिलांच्या बचत गटाची. या महिला विघटनशील व अविघटनशील असे आलेल्या निर्माल्याचे विभाजन करतात. परिसरातील साफसफाई हेच रोजीरोटीचे साधन असलेल्या या महिलांचा समर्थ भारत व्यासपीठने बचत गट तयार केला आहे. पहिल्या वर्षी त्या संपर्कात आल्यावर त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती, अनारोग्य, निरक्षरता असे त्यांचे विविध प्रश्न आहेत हे समर्थ भारत व्यासपीठच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पैशांची योग्य गुंतवणूक, साक्षरतेचे महत्त्व या महिलांना पटवून देण्यात आले. या महिलांचे गट तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांची खाती उघडली गेली. सफाई प्रशिक्षणासोबतच जॅकेट, टोपी, हातात घालण्यासाठी मोजे असे साहित्य या महिलांना देऊन त्यांचा आरोग्याची काळजीही घेतली जात असते. गणेश विसर्जनाच्या दिवसात निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करताना मनापासून आनंद मिळतो. पण पर्यावरण समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी समजून गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही सजावट करायला हवी, असे महिला बचत गटाच्या सदस्या लक्ष्मी सुखदेव साबळे यांनी सांगितले. लक्ष्मीसोबतच सुमन भीमा चंदनशिवे, पूजा निकाळजे, आशा वैराड, रेश्मा वैराड या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होत्या. आंबेघोसाळी येथील विसर्जन तलावाजवळ कुसुम व दुर्गा सोनावणे या महिला कामासाठी होत्या. दहा महिलांचा मिळून एक, अशा पाच बचत गटाच्या महिला या उपक्रमात काम करीत आहेत. गणपती विसर्जनाच्या चार दिवसांपैकी सातव्या दिवशीच्या विसर्जनाला तुलनेने जास्त गर्दी असते, त्या वेळेस निर्माल्याने हा ट्रक पूर्णपणे भरलेला असतो.
खतनिर्मिती प्रक्रिया
पाने, फु ले,केळीचे खांब अशा विघटनशील वस्तू खत निर्मितीसाठी पाठविल्या जातात. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते. विसर्जनाच्या चार दिवसात साधारणपणे 300 टन निर्माल्य संस्थेकडे गोळा होत असते. यामध्ये इतर सेवाभावी संस्थांचीही मदत होते. या सेवाभावी संस्था घराघरात, सोसायटीत जाऊन निर्माल्य गोळा करतात व समर्थ भारत व्यासपीठकडे सुपुर्द करतात. एस.टी.पी. प्लँट कोपरी येथे चालू असलेल्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाकडे निर्माल्याने भरलेले ट्रक रवाना होतात. खतनिर्मितीचे मोठया प्रमाणावर कार्य या ठिकाणी चालू असते. एस.टी.पी. प्लँटवर समर्थ भारत व्यासपीठचे कार्यकर्ते खत प्रक्रियेच्या कार्यात मदत करीत असतात.
पूर्वतयारी
गतवर्षी गणेश विसर्जनादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समर्थ भारत व्यासपीठ कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. प्लास्टिकच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी संस्थेने कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला. गणेश पूजनापूर्वी गणेशमूर्ती कारखान्यात जाऊन कापडी पिशवी व माहितीपत्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना घेऊन 27 व 28 ऑगस्ट 2014 रोजी ‘हर बार इको त्योहार’ असा संदेश देणारी रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये ठाणे व कळवा महानगरपालिकेच्या शाळांमधली प्रत्येकी 150 मुले सहभागी झाली होती. तसेच समाजप्रबोधनासाठी ग्रीनीचा (संदेश देणाऱ्या छोटयाशा रोपटयाचा) उपयोग करण्यात आला. पत्रकांच्या माध्यमातून आकर्षक पध्दतीने हा छोटा ग्रीनी ‘प्लास्टिकच्या पिशव्या टाळा, कापडी पिशव्या बाळगा, पर्यावरणाचे संवर्धन करा’ असे संदेश देई. यामुळे गणेशोत्सवापूर्वी व त्या दरम्यानही हा पत्रकातील ग्रीनी चर्चेचा विषय बनला.
ठाणे शहराचा विकास आराखडा
2005मध्ये समर्थ भारत व्यासपीठने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने ठाणे शहरासाठीचा विकासाचा आराखडा तयार केला. पुढच्या वीस वर्षांनी कचरा, पर्यावरण, पाणी अशा महत्त्वाच्या बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेची ध्येयधोरणे ठरवण्यात आली. त्यानंतर शून्य कचरा मोहिमेला सुरुवात झाली. घरच्या घरी कचरा व्यवस्थापन, निर्माल्य व्यवस्थापन अशा कार्यक्रमांना याअंतर्गत सुरुवात झाली. समाजकार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या सामाजिक संस्थांना घेऊ न ठाणे जिल्हा सामाजिक संस्था निर्धार समितीची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना या महोत्सवाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ देण्यात आली. संस्थेमार्फत दर वर्षी सफाई कामगार, शिक्षिका, खेळाडू, परिचारिका, डॉक्टर, वकील, शिक्षिका अशा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकी एका महिलेचा सत्कार करण्यात येतो.
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने ‘व्हिजन 2020′ आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वामी विवेकानंद व अब्दुल कलाम यांचे भविष्यातील भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास समर्थ भारत व्यासपीठने घेतला आहे. ठाण्याप्रमाणे पुणे, धुळे, सोलापूर या शहरातही समर्थ भारत व्यासपीठचे अविरत कार्य चालू आहे. दाऊद दळवी हे समर्थ भारत व्यासपीठ ठाणे शाखेचे अध्यक्ष आहेत, तर भटू सावंत, आरती नेमाणे, रीना गायकवाड, हितेश सगारिया हे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून संस्थेत काम करत आहेत. ठाणे शहराचा सर्वांगीण विकास या संकल्पपूर्तीसाठी संस्थेने ठाणेकरांना ‘आठवडयातील एक तास ठाणे शहरासाठी’ असे आवाहन केले आहे. ठाणे शहरातील देवालयांतील व नऊ स्मशानभूमीतील फुले गोळा करून त्यापासून खत तयार करण्याचा समर्थ भारत व्यासपीठचा मानस आहे.
9773770507