Monday, 22 September 2014

‘राइट टु पी’… चळवळ स्वच्छतागृहांसाठी

*****प्रवीण दाभोळकर*****
सध्या मुंबई शहरात महिलांच्या सुरक्षिततेइतकीच स्वच्छतागृहांचीही  तेवढीच गरज निर्माण झाली आहे. महिला स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे, असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्थाही दयनीय आहे. ‘राइट टु पी’ ही संघटना गेली तीन वर्षे शासनदरबारी या मागणीचा पाठपुरावा करीत आहे.  याअंतर्गत सध्या 32 सामाजिक संस्था या कामासाठी एकत्र आल्या आहेत. प्रशासनाला या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी आंदोलने, निदर्शने करण्यात आली, प्रत्येक रेल्वे स्थानकावर सह्यांची मोहीम राबवण्यात आली. महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित व मोफत स्वच्छतागृह हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे, त्यानुसार ध्येयपूर्तीसाठी अखंडपणे हे कार्य चालू आहे.
मुंबईच्या उपनगरांतून आणि त्याला लागून असलेल्या शहरांमधून अर्ध्याहून अधिक महिला/मुली शिक्षणासाठी, कामानिमित्त रोज घरातून बाहेर पडत असतात. सुरक्षिततेसोबतच प्रवासादरम्यान सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या कमतरतेसारख्या गंभीर समस्येला त्यांना रोजच्या रोज सामोरे जावे लागते आहे. देशाची आर्थिक महासत्ता असलेल्या मुंबई नगरीत महिलांसाठी स्वच्छ, सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहांची खूपच कमी संख्या ही खेदाची बाब आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला. पण प्रशासनाच्या आडमुठेपणापुढे त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यामुळे अधिक त्वेषाने पेटून उठत, नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह उपलब्ध असण्याचा अधिकार म्हणजेच ‘राइट टु पी’ या मोहिमेअंतर्गत तीन वर्षांपूर्वी एक चळवळ उभी राहिली. परिपत्रके, निवेदने, आंदोलने अशा माध्यमातून हा लढा चालू आहे. महिलांना स्वच्छ, सुरक्षित, मोफत व सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था असणे हे या चळवळीचे उद्दिष्ट आहे. ज्यावर उघडपणे बोलायला वा चर्चा करायला सर्वसामान्य स्त्रीला – मग ती शहरातली उच्चशिक्षित असो वा अल्पशिक्षित वा ग्रामीण भागात राहणारी असो – संकोच वाटत असे, असा हा विषय. मात्र तो प्रश्न थेट स्त्री आरोग्याशी संबंधित आहे. तेव्हा परंपरेने चालत आलेले सामाजिक संकेत, संकोच दूर सारून, या विषयावर उघडपणे चर्चा सुरू करून जनजागृती करणे ही आजच्या काळातली एक महत्त्वाची गरज आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन, मुंबईतल्या 32 सामाजिक संस्था ‘राइट टु पी’ या मोहिमेसाठी एकत्र आल्या आहेत, ही स्वागतार्ह बाब म्हणायला हवी.
स्वच्छतागृहांची गंभीर समस्या
1507180_662544790507830_743हा प्रश्न किती गंभीर आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे, हे समजून घेण्यासाठी सामाजिक संघटनांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवली. त्यात मिळालेल्या माहितीवरून, मुंबई शहरात महिलांकरिता असलेल्या स्वच्छतागृहांचे व्यवस्थापन व देखरेख करण्याकरिता वेगळी व्यवस्था नाही, हे उघडकीस आले. ‘राइट टु पी’- अर्थात लघवीसारख्या नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह उपलब्ध असण्याचा अधिकार, या अंतर्गत मुंबईतील वेगवेगळया सहा वॉर्डांमध्ये दादर, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, चेंबूर व घाटकोपर या उपनगरांतील एकूण 129 स्वच्छतागृहांतील महिलांसाठी उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून असे लक्षात आले की, ही सुविधा मोफत उपलब्ध असूनही स्वच्छतागृहात तसे स्पष्ट फलक लावलेले दिसत नाहीत. त्यामुळे तिथले व्यवस्थापक महिलांकडून पैसे आकारतात. ”हे स्वच्छतागृह फक्त शौचाला जाण्यासाठी उपलब्ध आहे” असे सांगत, त्यांचा मुतारी म्हणून वापर करायला व्यवस्थापक नकार देतात किंवा त्यासाठी पैसे उकळतात. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची – म्हणजे ‘युरिनल’गरज आहे. ”तुम्ही आत जाऊन नक्की काय करता ते आम्हांला कसं समजणार? तेव्हा पैसे द्यावे लागतील” अशा भाषेत बोलत महिलांकडून पैसे उकळले जातात. स्वच्छतागृहांमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी काही रक्कम महानगरपालिकेला द्यावी लागते, पण पैसे भरल्याची कोणतीही पावती या मंडळींकडे नसते. मुंबईतील महिलांच्या स्वच्छतागृहांची अवस्था फारच दयनीय आहे. कमी संख्येने असलेली ही स्वच्छतागृहे खूपच अस्वच्छ असतात. त्यामुळे खूप दुर्गंधी पसरलेली असते. स्वच्छतागृहांची पुरेशी सोय नसल्याने, घरातून निघताना फारसे पाणी न पिता – म्हणजे लघवी लागणार नाही याची काळजी घेत अनेक जणींना रोजचा प्रवास करावा लागतो, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.
प्रसारमाध्यमांचा पाठिंबा
251231_456781937707379_8849वर्तमानपत्रांतून, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून तसेच सोशल माध्यमांवरूनही या चळवळीला पाठिंबा, समर्थन मिळत आहे. या संदर्भात, सोळा रेल्वे स्थानकांवर सह्यांची मोहीम राबवली गेली. पन्नास हजार लोकांनी स्वाक्षरी करून या मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. पथनाटयाद्वारे जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली. ‘राइट टु पी’ने वेळोवेळी केलेला पाठपुरावा, आंदोलने, निदर्शने, त्याला प्रसारमाध्यमांनी दिलेली योग्य प्रसिध्दी यामुळे महिलांच्या स्वच्छतागृहांकडे झालेल्या दुर्लक्षाकडे प्रशासनाने लक्ष द्यायला सुरुवात केली. 2011 साली महिला स्वच्छतागृहांसाठीच्या मागण्यांच्या परिपत्रकानुसार सार्वजनिक स्वच्छतागृहांचा परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा, मलनि:सारण व सेप्टिक टँक नियमित साफ करण्यात यावे, शौचालयासंबंधीची संपूर्ण माहिती – व्यवस्थापन करणारी संस्था कोणती आहे, तिचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक हा सर्व तपशील – दर्शनी भागात लावण्याचा नियम परिपत्रकाद्वारे करण्यात नगरनियोजनात हा मुद्दा प्राधान्याने घेण्यात आला. मुंबईत गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहे व प्रसाधनगृहे बांधण्यासाठी प्रशासनाने 2012 व 2013 या कालावधीत 75 लाखांची, तर यंदाच्या वर्षी 1 कोटी एवढी तरतूद केलीआहे. मात्र कागदावर एवढी मोठी संख्या दिसत असली, तरीही प्रत्यक्षात तेवढया किंमतीची कामे झाल्याचे दिसत नाही. विकलांग महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे, महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये पुरुष व्यवस्थापकाची नेमणूक न करता फक्त स्त्री कर्मचाऱ्यांचीच नेमणूक करावी, सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, महिला बचत गटांना अशा कामामध्ये प्राधान्य द्यावे, अशा मागण्या ‘राइट टु पी’ ने महानगरपालिकेसमोर ठेवल्या आहेत.
आगळेवेगळे रक्षाबंधन
rakshabndhanनारळी पौर्णिमेचे औचित्य साधून, महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांसोबत ‘राइट टु पी’च्या महिला कार्यकर्त्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले. स्त्री-पुरुषांचे चित्र असलेल्या राख्या त्यासाठी बनवल्या गेल्या. यातून, ‘महिलांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत भेदभाव, असंवेदनशीलता नको’ असा संदेश राइट टू पी च्या कार्यकर्त्यांना द्यायचा होता. म्हणून सर्व अधिकाऱ्यांना निषेधाचे प्रतीक म्हणून राख्या बांधल्या गेल्या व लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासनही घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये महिलांच्या स्वच्छतागृहाच्या समस्या निवारणासाठी एक विशेष समिती असावी, ज्यामध्ये राइट टु पीचे व महानगरपालिकेचे प्रत्येकी पाच अधिकारी असतील, जे या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, असे ठरवण्यात आले. जी काही मोजकी स्वच्छतागृहे आहेत त्यांची साफसफाई प्रथम करा, ती सुरक्षित करा; त्याचबरोबर नवीन स्वच्छतागृहांची मागणीही पूर्ण करा अशा मागण्या ‘राइट टु पी’तर्फे ठेवण्यात आल्याचे या संस्थेच्या सुप्रिया सोनार यांनी सांगितले.
तरीही ठोस कारवाई नाहीच..
महानगरपालिकेकडे वारंवार निवेदने करूनही मुंबईतील महिलांच्या स्वच्छतागृहांच्या बाबतीत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. हा लढा महानगरपालिकेच्या कोण्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही, तर असंवेदनशील प्रवृत्तींच्या विरोधात हा लढा आहे. फक्त आंदोलन करून अशा समस्या मार्गी लागत नसतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या मदतीने प्रशासनावर अंकुश ठेवत, सर्वांना या मोहिमेत सामील करत हा प्रवास चालू आहे. फक्त ‘राइट टु पी’ या स्वयंसेवी संस्थेतील महिलांचीच ही समस्या नसून कामानिमित्त घरातून बाहेर पडणाऱ्या मुंबईतील प्रत्येकीला भेडसावणारी ही समस्या आहे. स्वच्छतागृहांमधली दर्ुव्यवस्था आणि त्यातून होणारा मानसिक त्रास यांच्याविरुध्दही हा लढा आहे. चूल-मूल सांभाळणाऱ्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात, तशा आपल्या नैसर्गिक गरजा पूर्ण करण्याकरिता न्याय्य मार्गाने लढूही शकतात, हे ‘राइट टु पी’ चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सिध्द केले आहे.
9773770507

1000 ठिकाणी ‘पे ऍंड यूज’ स्वच्छतागृहे बांधली आहेत, जी पूर्वीपासूनच आहेत. पण तेवढयाने आंदोलनकर्त्यांचे समाधान होत नाही. सुधारणेची गरज असेल तर नक्की सुधारणा करू.
- प्रकाश पाटील
सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन,
बृहन्मुंबई महानगरपालिका

स्वच्छतागृहांची व्यवस्था जवळपास नसेल, तर अशा वेळी स्त्रिया/मुली बऱ्याचदा पाणी पिणे टाळतात. त्यामुळे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा मानसिकतेतल्या महिला सल्ल्यासाठी येत असतात, ज्यांच्यामध्ये मूतखडा होणाऱ्यांचे प्रमाणही जास्त असते. तसेच फंगल इन्फेक्शनने ग्रासलेल्यांची संख्याही वाढलेली दिसते.
- डॉ. प्रिया हर्डीकर
स्त्रीरोगतज्ज्ञ

रस्ते, वीज, पाणी याप्रमाणे महिलांच्या स्वच्छतागृहांची मागणी हीदेखील मूलभूत गरज आहे. यासाठी आंदोलन करावे लागणे हीच दुर्दैवाची बाब आहे. या विषयाकडे बघण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन बदलणे महत्त्वाचे आहे.
- नयना सहस्रबुध्दे
भारतीय स्त्री शक्ती संघटना, राष्ट्रीय उपाध्यक्षा

Wednesday, 17 September 2014

यशस्वी होण्याचा राजमार्ग चला… यशस्वी होऊ या!

****प्रवीण दाभोळकर*****
पुस्तकाचे नाव : चला… यशस्वी होऊ या!
लेखक : सी.ई. पोतनीस
प्रकाशन : अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे
मूल्य : 160/- रु.  l  पृष्ठ : 132
आयुष्याच्या या स्पर्धेत यशस्वी व्हायचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगलेले असते. पण यातील काही जणांनाच यशाचे शिखर गाठणे शक्य होते. जीवनाप्रती आपली असलेली तळमळ, संस्कार, समाज, निश्चित ध्येय, उद्दिष्ट, सातत्य, मेहनत करण्याची तयारी अशा गोष्टी आपल्या यशाला कारणीभूत ठरत असतात. या गोष्टींवर विचार करता न आल्याने प्रामुख्याने तरुण मंडळी गोंधळलेल्या, द्विधा मनःस्थितीत असतात. ‘चला… यशस्वी होऊ या’ या पुस्तकाचे लेखक सी.ई. पोतनीस यांनी तरुणांची हीच मनःस्थिती ओळखून त्याच्याशी सुसंगत लेखन केले आहे. यात लिहिले गेलेले लेख लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून आल्याने त्याला वास्तवाचा स्पर्श आहे. पोतनीस यांना भारतात व परदेशात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सीईओ या पदावर बारा वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे काम करत त्यांनी अनेक आस्थापनांचे नेतृत्व केले आहे. तसेच शारीरिक, मानसिक व नातेसंबंधातील समस्यांवर ते इतरांना मदत करतात. याशिवाय करिअर व आयुष्यावरील समस्यांवर ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. लेखकांना आजवर भेटलेल्या माणसांचा बरा-वाईट अनुभव, मार्गदर्शन, माणसे वाचण्याची चिकित्सक वृत्ती या सर्वांची शिदोरी या पुस्तकातून अनुभवायला मिळेल.
आपल्या प्रत्येकातच काही ना काही गुण असतात. पण न्यूनगंड व कमतरतेची भावना यामुळे ते गुण लुप्त होतात. लेखकही याच अनुभवातून गेला होता. पण त्यातून लेखकाला जगण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, जो लेखणीतून उतरलेला दिसतो. ज्या न्यूनगंडामुळे आयुष्य समजायला वेळ जातो, त्या न्यूनगंडाचे आपण भक्ष्य न होता आपण आपली सकारात्मक ताकद ओळखत तिची व्याप्ती वाढविली पाहिजे. त्यामुळे ‘न्यूनगंड : शिकार नव्हे, शिकारी व्हा’ असा लेखच पुस्तकाची सुरुवात करतो. नेतृत्व आणि व्यवस्थापनातील गुण आपल्यात असल्याचे कालांतराने लेखकाच्या लक्षात आले, तसेच सकारात्मक विचार, मानसशास्त्र, अध्यात्म या विषयांची गोडीही याच दरम्यान लागली. संमोहनशास्त्राचा अभ्यासक्रमही शिकून झाला होता.
प्रत्येक तरुणामध्ये विविध गुण असतात. तरीही अनेकांना यश सतत हुलकावणी देत असते. जीवनाविषयी असलेल्या चुकीच्या समजुतीमुळे अनेक तरुणांना मार्गदर्शनाची असलेली गरज या पुस्तकाच्या वाचनाने पूर्ण होते. आपले यश हे केवळ आपलेच नाही, आपल्या यशाला असंख्य चांगल्या-वाईट प्रसंगांचा व व्यक्तींचा हातभार लागला आहे याची जाणीव असल्याने आयुष्याचे ध्येय विस्कटलेल्या तरुणांसाठी काम करण्याचे लेखकाने ठरविले. आईवडिलांपासून सुरू होऊन आपल्या आयुष्याच्या प्रवासात कळत-नकळत भेटलेल्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांना लेखक सी. ई. पोतनीस आपल्या पुस्तकाचे श्रेय देतात.
आपल्या यशाची व्याख्या काय? हे प्रत्येकाने प्रथम मनाशी पक्के करायला हवे. कारण उत्तम शिक्षण व अनेक गुण असूनही आपण आयुष्य जगलो असे बऱ्याच जणांना वाटत नाही. यासाठी ध्येय निश्चित करणे, त्यासाठी ध्येयाचे महत्त्व पटवून घेणे महत्त्वाचे आहे. चांगली संधी मिळाली नाही, म्हणून आयुष्यात प्रगती करता आली नाही अशी काही जण ओरड करत असतात. आव्हानांना सामोरे गेल्यावरच संधी निर्माण होते. बऱ्याचदा यश व अपयश हे या दृष्टिकोनातील बदलानेच कळते. येणाऱ्या आव्हानांना आपण काय प्रतिसाद देतो, यावर परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे लेखकाच्या मते आपल्या आव्हानांमध्ये संधी शोधण्याचा दृष्टिकोन किती आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्येक यशोगाथा या अपयशाच्या कहाण्या असतात. यशस्वी होण्याचा रस्ता अपयशाची आडवळणे घेऊनच आलेला असतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच यशस्वी आणि आनंदी जीवनासाठीची अष्टसूत्री चित्राच्या साहाय्याने रेखाटली आहे. पुस्तक हातात आल्यावर आधी मुखपृष्ठावरच लक्ष केंद्रित होते व आपण मुखपृष्ठाशी स्वत:ला तपासून पाहू लागतो. मलपृष्ठावर लेखकाच्या भारदस्त परिचयासोबत मुखपृष्ठाशी सुसंगत अशी मुद्देमांडणी केलेली आहे.
9773770507

दान निर्माल्याचे, रक्षण पर्यावरणाचे…

****प्रवीण दाभोळकर*****
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने व्हिजन 2020 आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या समर्थ भारत व्यासपीठ  व  ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जनातील निर्माल्य व्यवस्थापन उपक्रम चालू आहे. यामार्फत पाने, फुले, केळीचे खांब अशा निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंना खत निर्मितीसाठी पाठविले जाते. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते.
नंत चतुर्दशी…गणपती विसर्जनाचा दिवस. भक्तजनांच्या प्रचंड उत्साहात ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीसह बाप्पा आपल्या गावाच्या दिशेने निघाले होते. ठाण्यातील गडकरी रंगायतनजवळचा मासुंदा तलाव परिसरही असाच भाविकांच्या गर्दीने गजबजलेला. पोलिसांच्या देखरेखीत शिस्तबध्द पध्दतीने गणपती बाप्पा मासुंदा तलावाच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. हे दृश्य जवळजवळ सर्वच विसर्जन तलावांजवळ पाहायला मिळत होते. समर्थ भारत व्यासपीठाचे कार्यकर्ते प्रचंड गर्दीतही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नववीत शिकणारी रेश्मा प्रभाकर वैराड ही विद्यार्थिनीही आपल्या आईसोबत समर्थ भारतने आयोजित केलेल्या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होती. ”पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा” असे या चिमुरडीचे सर्वांना सांगणे होते. रेश्मा व तिची आई आशा वैराड या महिला बचत गटाच्या माध्यमातून समर्थ भारत व्यासपीठशी जोडल्या गेल्या. सर्व भक्तजन गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत आकंठ बुडालेले असताना काही महिलांनी व त्यांच्या लहानग्यांनी निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करून उपस्थितांना पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश देणे हे कौतुकाचे वाटले.
शिवाजी तलावाच्या बाजूलाच स्टॉल टाकला होता. तिथे उपस्थित कार्यकर्तेनिर्माल्यदान चळवळीत गणेशभक्तांना सामील होण्याचे आवाहन करत होते. ‘खत करू निर्माल्याचे, रक्षण करू पर्यावरणाचे’ हे या उपक्रमाचे घोषवाक्य येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधत होते. गणपती विसर्जनाच्या वेळी सोबत आणलेले निर्माल्य तलावात टाकून प्रदूषणाला आमंत्रण न देता ते समर्थ भारत व्यासपीठाला दान करावे, जेणेकरून खतनिर्मितीसाठी या निर्माल्याचा उपयोग करता येईल व पर्यावरण समतोल राखला जाईल, हा यामागचा पर्यावरण रक्षणाचा विचार आहे.  दीड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या कालावधीत हे कार्य गेली चार वर्षे चालू आहे. मासुंदा तलावापासून समर्थ भारत व्यासपीठाच्या या उपक्रमाला सुरुवात झाली. पहिल्याच वर्षी उपक्रम यशस्वी झाला. ठाणे महानगरपालिकेने त्याला मान्यता दिली. दुसऱ्या वर्षीपासून ठाणे महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापन केंद्र, सफाई कामगार यांच्या सोबतीने हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. शिवाजी तलावासोबतच मासुंदा तलावपाळी, रायलादेवी, आंबेघोसाळी, उपवन, कळवा गणेशघाट अशा ठाण्यात आठ ठिकाणी ठाणे मनपाचे सहा सफाई कामगार व बचत गटाच्या महिला यांना घेऊन समर्थ भारत व्यासपीठचे निर्माल्य व्यवस्थापनाचे कार्य चालते. या प्रत्येक ठिकाणी दोन ट्रक उपस्थित असतात, ज्यामध्ये विघटनशील व अविघटनशील असे निर्माल्याचे वर्गीकरण केलेजाते. समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम चालू आहे. कचराकुंडीत गोळा झालेले निर्माल्य ट्रकपर्यंत आणण्याचे काम ठाणे मनपाचे सफाई कामगार करतात. जास्तीत जास्त पर्यावरणस्नेही वस्तूंचा वापर करून, थर्माकोल वापर टाळून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करावा, असे ठाणे मनपाचे सफाई कामगार कचराकुंडीजवळ येणाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
महिला बचत गटाचे योगदान
यापुढची जबाबदारी असते ती समर्थ भारत व्यासपीठ अंतर्गत चालणाऱ्या महिलांच्या बचत गटाची. या महिला विघटनशील व अविघटनशील असे आलेल्या निर्माल्याचे विभाजन करतात. परिसरातील साफसफाई हेच रोजीरोटीचे साधन असलेल्या या महिलांचा समर्थ भारत व्यासपीठने बचत गट तयार केला आहे. पहिल्या वर्षी त्या संपर्कात आल्यावर त्यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती, अनारोग्य, निरक्षरता असे त्यांचे विविध प्रश्न आहेत हे समर्थ भारत व्यासपीठच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे  पैशांची योग्य गुंतवणूक, साक्षरतेचे महत्त्व या महिलांना पटवून देण्यात आले. या महिलांचे गट तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये त्यांची खाती उघडली गेली. सफाई प्रशिक्षणासोबतच जॅकेट, टोपी, हातात घालण्यासाठी मोजे असे साहित्य या महिलांना देऊन त्यांचा आरोग्याची काळजीही घेतली जात असते. गणेश विसर्जनाच्या दिवसात निर्माल्य व्यवस्थापनाचे काम करताना मनापासून आनंद मिळतो. पण पर्यावरण समतोल राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी समजून गणेशभक्तांनी पर्यावरणस्नेही सजावट करायला हवी, असे महिला बचत गटाच्या सदस्या लक्ष्मी सुखदेव साबळे यांनी सांगितले. लक्ष्मीसोबतच सुमन भीमा चंदनशिवे, पूजा निकाळजे, आशा वैराड, रेश्मा वैराड या मासुंदा तलावाजवळच्या निर्माल्य व्यवस्थापनाच्या सत्कार्यात हातभार लावत होत्या. आंबेघोसाळी येथील विसर्जन तलावाजवळ कुसुम व दुर्गा सोनावणे या महिला कामासाठी होत्या. दहा महिलांचा मिळून एक, अशा पाच बचत गटाच्या महिला या उपक्रमात काम करीत आहेत. गणपती विसर्जनाच्या चार दिवसांपैकी सातव्या दिवशीच्या विसर्जनाला तुलनेने जास्त गर्दी असते, त्या वेळेस निर्माल्याने हा ट्रक पूर्णपणे भरलेला असतो.
खतनिर्मिती प्रक्रिया
पाने, फु ले,केळीचे खांब अशा विघटनशील वस्तू खत निर्मितीसाठी पाठविल्या जातात. तसेच सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकसारख्या अविघटनशील वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी पाठविल्या जातात. हे निर्माल्य तळयात टाकून पाण्याचे प्रदूषण करण्यापेक्षा संस्थेकडे दिल्यास त्याचे खतात रूपांतर होते. विसर्जनाच्या चार दिवसात साधारणपणे 300 टन निर्माल्य संस्थेकडे गोळा होत असते. यामध्ये इतर सेवाभावी संस्थांचीही मदत होते. या सेवाभावी संस्था घराघरात, सोसायटीत जाऊन निर्माल्य गोळा करतात व समर्थ भारत व्यासपीठकडे सुपुर्द करतात. एस.टी.पी. प्लँट कोपरी येथे चालू असलेल्या खतनिर्मितीच्या प्रकल्पाकडे निर्माल्याने भरलेले ट्रक रवाना होतात. खतनिर्मितीचे मोठया प्रमाणावर कार्य या ठिकाणी चालू असते. एस.टी.पी. प्लँटवर समर्थ भारत व्यासपीठचे कार्यकर्ते खत प्रक्रियेच्या कार्यात मदत करीत असतात.
पूर्वतयारी
गतवर्षी गणेश विसर्जनादरम्यान प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण जास्त असल्याचे समर्थ भारत व्यासपीठ कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. प्लास्टिकच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी संस्थेने कापडी पिशव्यांचा पर्याय निवडला. गणेश पूजनापूर्वी गणेशमूर्ती कारखान्यात जाऊन कापडी पिशवी व माहितीपत्र कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच  महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना घेऊन 27 व 28 ऑगस्ट 2014 रोजी ‘हर बार इको त्योहार’ असा संदेश देणारी रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये ठाणे व कळवा महानगरपालिकेच्या शाळांमधली प्रत्येकी 150 मुले सहभागी झाली होती. तसेच समाजप्रबोधनासाठी ग्रीनीचा  (संदेश देणाऱ्या छोटयाशा रोपटयाचा) उपयोग करण्यात आला. पत्रकांच्या माध्यमातून आकर्षक पध्दतीने हा छोटा ग्रीनी ‘प्लास्टिकच्या पिशव्या टाळा, कापडी पिशव्या बाळगा, पर्यावरणाचे संवर्धन करा’ असे संदेश देई. यामुळे गणेशोत्सवापूर्वी व त्या दरम्यानही हा पत्रकातील ग्रीनी चर्चेचा विषय बनला.
ठाणे शहराचा विकास आराखडा
2005मध्ये समर्थ भारत व्यासपीठने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने ठाणे शहरासाठीचा विकासाचा आराखडा तयार केला. पुढच्या वीस वर्षांनी कचरा, पर्यावरण, पाणी अशा महत्त्वाच्या बाबींचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेची ध्येयधोरणे ठरवण्यात आली. त्यानंतर शून्य कचरा मोहिमेला सुरुवात झाली. घरच्या घरी कचरा व्यवस्थापन, निर्माल्य व्यवस्थापन अशा कार्यक्रमांना याअंतर्गत सुरुवात झाली. समाजकार्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या सामाजिक संस्थांना घेऊ न ठाणे जिल्हा सामाजिक संस्था निर्धार समितीची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील महिलांनी बनविलेल्या वस्तूंना या महोत्सवाच्या माध्यमातून थेट बाजारपेठ देण्यात आली. संस्थेमार्फत दर वर्षी सफाई कामगार, शिक्षिका, खेळाडू, परिचारिका, डॉक्टर, वकील, शिक्षिका अशा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकी एका महिलेचा सत्कार करण्यात येतो.
जन, जल, जंगल, जमीन, जनावर आणि त्यांना व्यापणारे पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास या दृष्टीने ‘व्हिजन 2020′ आराखडा तयार करून कार्यरत ठेवणे हे समर्थ भारत व्यासपीठचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वामी विवेकानंद व अब्दुल कलाम यांचे भविष्यातील भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास समर्थ भारत व्यासपीठने घेतला आहे. ठाण्याप्रमाणे पुणे, धुळे, सोलापूर या शहरातही समर्थ भारत व्यासपीठचे अविरत कार्य चालू आहे. दाऊद दळवी हे समर्थ भारत व्यासपीठ ठाणे शाखेचे अध्यक्ष आहेत, तर भटू सावंत, आरती नेमाणे, रीना गायकवाड, हितेश सगारिया हे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून संस्थेत काम करत आहेत. ठाणे शहराचा सर्वांगीण विकास या संकल्पपूर्तीसाठी संस्थेने ठाणेकरांना ‘आठवडयातील एक तास ठाणे शहरासाठी’ असे आवाहन केले आहे. ठाणे शहरातील देवालयांतील व नऊ स्मशानभूमीतील फुले गोळा करून त्यापासून खत तयार करण्याचा समर्थ भारत व्यासपीठचा मानस आहे.
 9773770507