Tuesday, 15 July 2014

प्रोजेक्ट फॅन्ड्रीच्या निमित्ताने....

  1. .......आणि प्रोजक्ट फॅन्ड्री यशस्वी झालाच. आज सगळीकडुन टीम फॅन्ड्रीच कौतुक होतयं. टीम फॅन्ड्रीचा एक भाग असल्याने काही आठवणी ताज्या झाल्या त्या कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केलायं. "टीम फँड्री" या नेटीझन ग्रुपने "प्रोजेक्ट फँड्री या उपक्रमाअंतर्गत "संवेदना सामाजिक बांधिलकीची" या टँग लाईनखाली हा सामाजिक बांधीलकीचा प्रपंच मांडला. ६ जुलै रोजी डहाणू कोटबी येथील खिंड पाडा या आदिवासी वस्तीवर ५५ स्वयंसेवकांनी भेट दिली. पाच जणांपासुन सुरुवात झालेल्या या प्रोजक्टला सोशल मिडीयामुळे दसपटीने कार्यकर्ते मिळाले. अनेक नव्या-जुन्या माणसांशी या निमित्ताने भेटीगाठी होत गेल्या, खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.


ज्या समाजातील संस्कारातुन आपण लहानाचे मोठे होत असतो त्या समाजासाठी काहीतरी करत असाव अस काहीस मनाला वाटत असत. समाजातील दुर्बल, मागसलेल्या बांधवाना समाजाच्या बरोबरीन चालता याव यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा अस कॉलेजलाईफपासून वाटत आलयं. मग एन.एन.एसच्या माध्यमातुन समाजप्रबोधनात्मक पथनाट्य करणे, फुटपाथवर राहणार्या गरीब मुलांना महविद्यालयात आणुन शिकवण्याचा स्वप्नपुर्ती प्रोजेक्ट असो, किंवा बदलापूर मधील आदीवासी पाड्यात सातत्याने काम करणे अशा काही कामांना एम.डी महाविद्यातुन सुरुवात झाली. पुढे करीअर व नोकरीच्यामागे फिरताना आपली आवड मागे राहते आहे काय अस वाटायला लागल पण अचानक एकदा रवी चाचे दादांचा फोन आला आणि ही चक्र मागे फिरु लागली. फॅन्ड्री सिनेमातील जब्याप्रमाणे अनेक जब्या आपल्या परीसरात असतात त्यांची नेहमीचे कपडे घालण्याची परीस्थितीही नसते या परीस्थितीवर आपल्याला काही काम करायच, अस दादांनी सांगितल. या माणसांपर्यंत जुने पण चांगले वापरातले कपडे पोहोचवायचे होते. विपुल पोरे, शशांक बोरे, प्रथमेश दिवेकर, मिलींद कांबळे अशा आम्हा पाच जणांवर ही प्राथमिक जबाबदारी होती. सोशल मिडीयाची मदत घेवुन आम्ही प्रोजेक्ट फॅन्ड्रीचा श्रीगणेशा केला.

आणि प्रोजेक्टला सुरुवात झाली....

मुंबईपासुन जवळच्या अंतरावर अनेक आदीवासी पाडे असे आहेत जिथे माणसांना अंग झाकण्यासाठी लागणार्या कपड्यांसाठी ही खुप खस्ता खाव्या लागतात. तर दुसर्याबाजुस आपल्याकडे अशीही अनेक मंडळी असतात की कपडे वापरुन जुने झाले की भांडीवाले किंवा चिंधीवाले यांना देउन छोटीमोठी भांडी घेत असतात. अशा जुन्या पण चांगल्या कपड्यांचा चांगला उपयोग करत हे कपडे आदीवासी पाड्यातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्हाला करायचे होते. हळुहळु ही संकल्पना सर्वांना आवडली. एक चांगला अनुभव म्हणजे कोणाच्याही घरातुन फाटलेले,खराब कपडे मिळाले नाहीत. समाजकार्याचा भाग म्हणुन जबाबदारीने प्रत्येकाने धुवुन स्वच्छ केलेले कपडेच आमच्यापर्यंत टिमपर्यंत पोहोचवले. काही समाजसेवकांनी पुढे येत आर्थिक मदत केली. प्रोजेक्टसाठी कपडे आणि आर्थिक मदत मिळायला हळुहळु सुरुवात झाली. काही आदीवासी पाड्यात अनेक सेवाभावी संस्था पोहोचत असतात, ही मिळालेली मदत अशा भागात पोहोचवायची होती जिथे खरोखर गरज होती किंवा कोणतीही संस्था तिथे पोहोचत नसावी. सोशल मिडीयाच्या माध्यमातुनच काही संपर्क मिळाले आणि डहाणु येथील कोटबी या आदीवासी पाड्याच नाव कळाल. एका रविवारी कोटबीला जायच ठरल. दत्ताराम वळवणकर दादा, पंकज राणे, शशांक बोरे, आकाश शिंदे अशी आम्ही मंडळी डहाणुला पोहोचलो. तिथल्या एका डॉ. परहाड या समाजसेवकांशी संपर्क होता पण खास अशी ओळख नव्हती. 


पाड्याच्या शोधात टिम फॅन्ड्री....


मुंबईपासुन दोन-अडीच तासाच अंतर पार करत आम्ही डहाणुला पोहोचलो खरे पण कोटबी डहाणुपासुन कुठे आल याची माहीती नव्हती. एका रीक्षावाल्याला चरी कोटबी अस गाव माहीती होत मग तिथेच जायच ठरल. गावात गेल्यावर तिथली माणस, गावचे सरपंच, पोलीस, शिक्षक अशा माणसांना भेटायच ठरल होत. ज्या समाजसेवकांनी गावाच नाव सुचवल त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. रिक्षातुन जाताना तिथल गाव कस असेल, समोरुन भेटणारी माणस कसा प्रतिसाद देतील असे अनेक प्रश्न मनात येत होते. आपला हेतु प्रामाणिक होता त्यामुळे कसली भिती नव्हती. गावच्या वाटेवरुन जाताना पोलिस चौकी बंद दिसली, शेवटी रीक्षा एका ग्रामपंचायती समोर थांबली. गावाची पाहणी करुन सरपंचाना भेटायच ठरल, त्यांच घर गाठल तर सरपंच बाई घरी नव्हत्या, त्यांना यायला तीन-चार तास तरी लागणार होते. सरपंच बाईंच्या पतीला आम्ही आमची संकल्पना समाजावली. आम्ही मुंबईचे म्हणुन त्यांच्या गावच पाणी पिउ का असा त्यांना संभ्रम पडला असावा. बोलुन झाल्यावर थोड कचरतच त्यांनी आम्हाला पाणी देउ का अस विचारल. प्रवासाने थोडेफार दमल्याने आम्ही ही पाण्याचीच वाट बघत होतो. गावकर्यांना विश्वासात घेण हे महत्वाच पहील काम वाटु लागल. तेवढ्यात एक मनुष्य आम्हाला लांबुन पाहतोय अस जाणवल. आम्ही त्याला चर्चेत सामील होण्याचे हावभाव दर्शविले. तो माणुस म्हणजे त्या गावातील रावते सर होते. तिथल्या समाजसेवक परमाड सरांनी त्यांना आम्ही येणार आहोत याची कल्पना दिली होती. रावते सरांनी सांगितल की ते सकाळपासुन आमचीच वाट बघत होते आणि आम्हाला बघितल्यावर त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्यावरुन लपत नव्हता..रावते सर गावचे माजी सरपंच होते, गावाबद्दल त्यांना खुप कळकळ दिसत होती पण एकंदरीत परीस्थितीमुळे त्यांचे हात बांधलेले होते.

ग्रामपंचायती पासुन पुढे थोड्या अंतरावर हा आदीवासी पाडा होता, जिथे आम्हाला समाजकार्य पोहोचवायच होत. रावते सरांनी कोटबी, खिंडपाडाची प्राथमिक शाळा दाखविली जिथे 1 ते 4 थीचे विद्यार्थी शिकत होते. कपडे वाटप करणे हा मुख्य हेतु होता पण या निमीत्ताने काही आर्थिक मदत ही मिळत होती जिचा चांगला उपयोग आम्हाला करायचा होता. शाळेतल्या मुलांच्या प्राथमिक गरजांचा अंदाज आम्ही घेतला. शेती सोडुन तिथल्या लोकांना फारस वेगळ उत्पन्न नाही. त्यामुळे पोटापाण्यासाठी ही माणस सतत स्थलांतर करत असतात. जवळच एक आश्रमशाळा आहे जिथे 268 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना वह्या-पुस्तके व कब्बडी, खोखो या खेळांसाठी खेळाच्या कपड्यांची गरज होती, शाळेला कुंपण नव्हत. अशा अऩेक गोष्टी कोटबी गावासाठी करण्यासारख्या होत्या. प्राथमिक गरजांना प्राधान्य द्यायच म्हणुन मोठमोठी आश्वासन न देता शक्य होईल तेवढी जास्त मदत करु असा शब्द आम्ही रावते सरांना दिला. आम्ही एक लिस्टच बनवली व टिम फॅन्ड्रीच्या सर्व मेंबर्ससमोर ठेवली. प्रदीप भालेकर सारखा खंदा कार्यकर्ता सोबत होता जो स्वतहाहुन अनेक जवावदारी घेत होता. एक ड्रेस कोड म्हणुन स्वखर्चाने टीशर्ट घालायची ठरल त्याची जबाबदारी दिपेश कांबळे ने घेतली. अनेक मंडळी ज्यांची नाव लिहायला जागा पुरणार नाही आणि कौतुक करुन मन भरणार नाही अशी माणस भेटत गेली. प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करायच होत त्याला प्रोजेक्ट फॅन्ड्री हे निमीत्त ठरल. सोशल मिडीयावरुन अनेक मंडळी एव्हाना स्वतहाहुन पुढे येत होती.



नागराज मंजुळेंची कौतुकाची थाप मिळाली....


प्रोजेक्ट फॅन्ड्री ही कल्पना फॅन्ड्री सिनेमामुळे पुढे आली होती. फॅन्ड्री सिनेमा हा पौगांडावस्थेतील मुलाची प्रेमकथा म्हणुन सर्वत्र गाजला पण यात समाजापासुन दुर्लक्षित असलेल्या समाजाचे चित्रणही तितक्याच ताकतीने चित्रित केले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कानावर टिम मेंबर दक्षता ठसाळेने प्रोजेक्ट फॅन्ड्रीची ही संकल्पना मांडली. एका कार्यक्रमासाठी नागराजजी मुंबईत येणार होते.त्यांनी आम्हाला तिथे भेटण्यासाठी वेळ दिला. खुप शांत स्वभावाचा, कवी मनाचा ग्रेट माणुस आमच्यासमोर उभा होता. खुप शांततेने त्यांनी संकल्पना ऐकली. महात्मा फुले, ज्योतीबाई फुले अशी पुस्तके वाचा असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला, प्रोजक्टला खुप शुभेच्छा दिल्या. आता टिम फॅन्ड्रीचा आत्मविश्वास अजुनच वाढला होता. नागराज मंजुळे टिम फॅन्ड्रीला भेटल्याची बातमी खुप पसरली. लोकमत, पुढारी, मुंबई चौफेर अशा आघाडीच्या वर्तमान पत्रात छापुन आली. प्रोजेक्ट फॅन्ड्री या फेसबुक लाईक पेजला बनविल्यावर काही दिवसातच पाचशे लाईक्स मिळाले ही संख्या वाढतच होती. सगळ कस गुडी गुडी घडायला लागल.


फायनली तो दिवस आलाच....

सोशल मिडीयाच्या माध्यमातुनच पन्नास मुल फॅन्ड्री प्रोजेक्ट फॅन्ड्रीसाठी डहाणु, कुटबी या पाड्यात येणार होती. व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सर्व एकमेकांच्या संपर्कात होते. आदल्या दिवशी कुर्ला स्थानकाजवळ एक टेंम्पो भाड्याने केला ज्यात सर्व कपडे लोड करण्यात आले. दुसर्या दिवशी सकाळीच हा टेम्पो डहाणुच्या दिशेने रवाना झाला. 55 तरुण मुल मुली बोरीवली रेल्वे स्थानकावर भेटले आणि डहाणुमार्गे कोटबी गाव गाठल. रावते सर सर्वांची वाट बघत होते. गावकर्यांनी स्थानिक संस्कृती दाखविणारा खेळ आमच्या मनोरंजनासाठी आयोजला होता. कपड्यांनी भरलेला टेम्पो शाळेत रीकामी करण्यात आला. स्त्रिया, पुरुष, लहान मुले-मुली अस कपड्यांच वर्गीकरण झाल. गावाला एखाद्या जत्रेच वातावरण आल होत. सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद दिसत होता. तेथील नागरिकांना कपडे वाटप आणि प्राथमिक शाळेतील ३१ विद्यार्थ्यांना पाट्या,पेन्सील, पेन,वह्या आणि खावू दिला गेला. त्यामुलांसाठी एक मोठा केक नेण्यात आला होता. तसेच माध्यमिक शालेतील २६८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वह्यांचे वाटप करण्यात आले. नजीकच्या निवासी आश्रमशाळेतील खो खो आणि कब्बडीच्या मुले आणि मुलींच्या संघाला क्रीडा गणवेशाचे वाटप आणि व्हॉलीबॉल/व्हॉलीबॉलची नेट, फुट बॉल, चेस, आणि लहान मुलींसाठी दोरीउड्या या साहित्याचे वाटप करण्यात आले. बच्चे कंपनीसाठी एक केक पार्टी सेलिब्रेशन झाल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्या देण्यात आल्या. खेळाच साहीत्य आणि खेळाचे कपडेही त्या मुलांना दिले गेले. टिम फॅन्ड्रीसोबत त्या मुलामुलींनी कबड्डीचा सामना देखील आनंदाने खेळला. 


प्रोजेक्ट फॅन्ड्रीच्या यशाचा आनंद...

आता सध्याकाळ होत चालली होती. घरी जायची वेळ झाली. प्रत्येकाच्या चेहर्यावर काहीतरी वेगळ केल्याचे समाधान दिसत होते. मुंबईच्या धक्काधक्कीच्या जिवनात जगणार्या आमच्या बांधवानी गावकर्यांसाठी कपडे, आर्थिक मदत, शुभेच्छा, पाठींबा अस खुप काही पाठवल होत जे आम्ही टिम फॅन्ड्री म्हणुन गावपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो होतो. स्नेहा खविसकर या मैत्रिणीने आता आपल्याला फॅन्ड्री प्रोजेक्ट-2 करायचा आहे अशी घोषणा केली आणि सर्वांनी टाळ्या वाजवत तिला पाठींबाही दिला. घरी आल्यावर सर्व आपआपल्या कामधंद्यात पुन्हा मग्न झाले आहेत पण प्रोजेक्ट फॅन्ड्री-2 साठी सर्वजण दुगण्या तादतीने एकत्र आले आहेत. प्रोजेक्ट फॅन्ड्री यशस्वी करणे कोणा एकाला कधीच शक्य नव्हत. पण सोशल मिडीयाने आमच्या तरुणांना एक ताकद दिली,एकत्र बांधुन ठेवल म्हणुन प्रोजेक्ट फॅन्ड्री यशस्वी झाला. आमच्या एका दिवसाने तिथल्या माणसांमध्ये खुप मोठा अमुलाग्र बदल होईल अशातला भाग नाही पण त्या बांधवांसाठी यापुढची काम करण्यासाठी लागणारा विश्वास आम्ही काही अंशी नक्कीच मिळवला असेल. आज प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वजण प्रोजेक्ट फॅन्ड्री या नावाने ओळखतात आणि नेक्स्ट ईज व्हॉट..अस विचारतात..प्रोजेक्ट फॅन्ड्रीच्या निमीत्ताने एक नवी संकल्पना घेवुन, नव्या समाजकार्यासाठी सोशल मिडीयाच्या मदतीने आम्ही सर्व तरुण पुन्हा एकत्र येत आहोत. समाजमनाची जाणीव असलेली आपल्यासारखी असंख्य मंडळी या माध्यमातुन पुन्हा जोडली जातील हा विश्वास आहेच. 

 

-प्रविण दाभोळकर

1 comment: