*****प्रवीण दाभोळकर*****
चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या समाजसेवेची आवड असणाऱ्या तरुणांनी प्रकल्पाला सुरूवात केली. दर रविवारी पदपथावर राहणाऱ्या मुलांना परळच्या एम.डी. महाविद्यालयात आणायचे आणि शिकवायचे हा यामागचा उद्देश होता. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला'स्वप्नपूर्ती' हे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्ती' या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. सध्या 'स्वप्नपूर्ती' या प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडी, लालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्या,आगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
मुंबईत रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना दिसतात. अशा वेळी त्या लहान मुलांना कोणी शाळेचे-शिक्षणाचे महत्त्व सांगितले, तर ते ऐकण्याच्या मानसिकतेत मुळीच नसतात. काही दिवसांपूर्वीच परळ नाक्याच्या सिग्नलवर सलीम नावाचा 8-9 वर्षाचा एक मुलगा भीक मागत होता. त्याची विचारपूस केल्यावर कळले की वांद्रयाच्या झोपडपट्टीत तो राहतो व रोज तिथून इथे भीक मागायला येतो. त्याला कोणी इथे पाठवले, घरातले कुठे असतात अशी माहिती सांगणे तो जाणीवपूर्वक टाळत होता. शिक्षणाबद्दल काही ऐकून घेण्याची त्याची इच्छाच नव्हती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात रहदारीच्या सगळयाच रस्त्यांवर काही लहान मुले भीक मागताना आपल्याला सररास दिसतात. रस्त्यावरच्या या लहान मुलांचे आयुष्य आणि शिक्षणाची स्थिती गंभीर आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
चार वर्षांपूर्वी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात त्या वेळी शिकणारे प्रवीण भिकले व प्रशांत माने या तरुण विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड होती. रस्त्यावरच्या मुलांना अक्षरओळख करून देण्याची संकल्पना दोघांच्या मनात आली. काळाचौकीला पदपथावर अशी झोपडपट्टी आहे, असे महाविद्यालयातील मैत्रीण धनश्री माने हिने त्यांना सांगितले. दररोज महाविद्यालयात जाताना वाटेवर दिसणारी अशी मुले त्यांचे नेहमी लक्ष वेधून घ्यायची. प्रवीण आणि प्रशांत यांनी त्यांच्यावर लक्ष ठेवायचे ठरवले. काळाचौकी पोलीस ठाण्याजवळील श्रावण यशवंते चौकात गेल्या काही वर्षांपासून काही कुटुंबे झोपडयांमध्ये राहतात, हे त्यांनी पाहिले. भंगाराच्या बदल्यात लसूण विकणे हा इथल्या स्त्रियांचा प्रमुख व्यवसाय. दारू पिणाऱ्या नवऱ्यांमुळे संध्याकाळी घरी रोज भांडण, मारझोड हे ठरलेलेच. पदपथावरचा महानगरपालिकेचा दिवा हाच त्यांच्यासाठी प्रकाशाचा काय तो एकमेव स्रोत. या झोपडयांमध्ये मिळून पंधरा वर्षाखालची जवळजवळ 10 ते 12 मुले आहेत. त्यातील काही जण जवळच्या महानगरपालिकेच्या शाळेत जात, तर उरलेली मुले नुसत्याच उनाडक्या करीत असत. मग कधी त्यांच्या आईसोबत खांद्यावर पिशवी टाकून लसूण विकायला जायचे, तिथेच कोणी काय देईल ते खायचे, तर कधी दिवसभर भटकत राहायचे. जवळ कुठे जत्रा असेल तर घोळक्याने जत्रेत जायचे, फिरायचे, कोणाकडे तरी खायला मागायचे आणि जिवाची मुंबई करायची. सर्वसाधारण घरात शिकणाऱ्या मुलांपेक्षा अनेक कला यांना अवगत असतात. रस्ता कसा पार करायचा हे इतर मुलांना शिकवावे लागते, पण पदपथावरच्या या मुलांना याची एवढी सवय झालेली असते की गाडया चुकवत चुकवत गाडीचा वेग पकडून ते सराईतपणे रस्ता पार करीत असतात. चेहरा केविलवाणा करून खायला मागायची, बऱ्याचदा आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची अजब कला त्यांच्यामध्ये दिसून येते. वरकरणी साधीसरळ दिसणारी ही मुले बेरक्या वृत्तीची होती. यांची दिनचर्या आणि ते नेमके कुठे राहतात, काय करतात याची माहिती काढण्यासाठी त्यांनी मुलांवर पाळत ठेवली. खाण्याचे आमिष दाखवूनही ही मुले शिक्षण घ्यायला तयार होणारी नव्हती, असे त्यांच्या निदर्शनास आले. समोरच्याकडून खायचे काढून घेऊन त्यांच्या हातावर तुरी देऊन पळण्यात ते पटाईत होते.
या मुलांना शिकवायचे असेल, तर त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज होती. काही वाईट सवयी असल्या तरी मुलांमध्ये शिक्षणाबद्दल उदासीनता आहे, असे प्रवीण व प्रशांत यांना कधीच वाटले नाही. अखेर मुलांच्या पालकांना जाऊन समजवायचे ठरले. पालकांना भेटून या विद्यार्थ्यांना अनपेक्षित धक्का बसला. मुलांना कितीही शिकवले तरी त्यांना भीकच मागावी लागणार आहे, अशी त्या पालकांची मानसिकता पाहायला मिळाली. पण मुले जर शिकली तर स्वत:च्या पायावर उभी राहू शकतील, स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकतील हे समजावताना विद्यार्थ्यांच्या नाकीनऊ यायचे. दारूमुळे तर्राट झालेल्या मुलांच्या वडिलांनी या शिक्षणाला नकार दिला, पण कोणीतरी चांगली शिकलेली मुले काहीतरी चांगले सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असे त्या मुलांच्या आयांना वाटायला लागले. त्यांनी सहकार्याची भावना दाखवली. फक्त एकदा भेटून, विचारपूस करून हा प्रश्न मार्गी लागणारा नव्हता. अखेर हे शिवधनुष्य पेलायचे ठरलेच. प्रवीण, प्रशांत यांच्यासोबत धनश्री माने व आणखी काही मित्रमंडळी या ध्येयपूर्तीसाठी कामाला लागली. वेळ मिळेल तसा यांच्या झोपडीत जाऊन विचारपूस करू लागली. पदपथावर मुलांच्या मांडीला मांडी लावून बसू लागली. धनश्री माने ही विद्यार्थिनी शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या पाठयपुस्तकातला अभ्यासक्रम शिकवू लागली. प्रत्येक मुलाला नावाने ओळखू लागली. शाळेत न जाणारी व दिवसभर उनाडक्या करणारी शेजारची मुलेसुध्दा, 'ही काय नवी भानगड?' म्हणून येऊन बाजूला बसू लागली. असे अनेक दिवस गेले. येणारी-जाणारी माणसे, बसची वाट बघणारी माणसे एक उत्सुकता म्हणून पाहत व निघून जात असत. इतर मुलांसारखे शिकवणी वर्ग या मुलांकडे नसल्याने मुलांनाही नवीन माणसाकडून काहीतरी शिकल्याचा आनंद मिळत होता. काही सुशिक्षित मुले आपल्या लेकरांना काहीतरी चांगले शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे एव्हाना त्यांच्या पालकांना समजू लागले होते. पालकही आता मनमोकळेपणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधू लागले होते. पण या सगळया प्रकल्पात प्रवीण आणि प्रशांत यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. महाविद्यालयातला स्वत:चा अभ्यास, घरातील कामे, त्यात झोपडीमध्ये संध्याकाळी विजेची असलेली समस्या, आजूबाजूची वर्दळ यामुळे मुलांना शिकवणे प्रवीण, प्रशांत यांना थोडे कठीण वाटू लागले. यासाठी अपल्या मित्रमंडळींचीही मदत घेतली जाऊ शकते, असा त्यांनी विचार केला. एम.डी. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग वेगवेगळया सामाजिक उपक्रमांमुळे चांगलाच चर्चेत होता. सर्वांच्या सहकार्याने मुलांना शिकवण्याचे हे काम रा.से.यो.अंतर्गत स्वतंत्र प्रकल्प म्हणून पुढेदेखील सुरू ठेवण्याचा निश्चय केला. महाविद्यालयात मुलांना शिकवण्याच्या या प्रकल्पाला परवानगी मिळवण्यासाठी रा.से.यो.चे प्रा.डॉ.अविनाश कारंडे सर यांनी प्राचार्य घुले मॅडम यांच्याकडे मदत मागितली. प्राचार्यांनीही कोणतीही हरकत न घेता विद्यार्थ्यांच्या जबाबदारीवर या मुलांना महाविद्यालयात आणून शिकवण्याची परवानगी दिली.
काळाचौकी येथील झोपडपट्टीतील व आजूबाजूच्या परिसरातील दहा मुलांना नियमित शिकवायचे, असे ठरले. रा.से.यो.चे ठरावीक वीस विद्यार्थी या प्रकल्पावर काम करणार होते. पाच-पाचच्या गटाने दर रविवारी या मुलांना महाविद्यालयात आणायचे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच एखादी वस्तू बनवणे, नृत्य, संगीत, चित्रकला शिकवणे असे उपक्रम सुरू झाले. रस्त्यावरील या मुलांना अनेक वाईट सवयी होत्या. त्यातून त्यांना बाहेर काढणे मोठया जिकिरीचे काम होते.
दर रविवारी मुलांना परळला एम.डी. महाविद्यालयात आणले जायचे आणि शिकवले जायचे. चिमुरडयांच्या स्वप्नांना नवे पंख मिळावे म्हणून या प्रकल्पाला 'स्वप्नपूर्ती' हे नाव दिले गेले. 2010 साली दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 'स्वप्नपूर्ती' या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. त्या दिवशी शाळेत जाणारी मुले आपापल्या शालेय गणवेशासह महाविद्यालयात हजर झाली. महाविद्यालयात शिस्तीचे पालन करावे लागेल, असे त्यांना आधीच सांगितले गेले होते. सुरुवातीला काही क्षण कावऱ्याबावऱ्या नजरेने बघणारी ही मुले लगेच बोलती झाली. एकदा सांगितल्यावर पटापट आपल्या आवडीचे गाणे,अभिनय करून महाविद्यालयातील मुलांवर आपली छाप पाडत होते. गणेश नावाच्या मुलाने तर अमिताभ बच्चन, सनी देओल अशा अभिनेत्यांची हुबेहूब नक्कल करत सर्वांना स्वत:च्या प्रेमात पाडले. विद्यार्थीही आ वासून हा सर्व प्रकार पाहायला लागले. मुलांना शिकवण्याची त्यांची उत्सुकता आणखी वाढू लागली. 'तुम्हाला काय व्हायचेय?' या प्रश्नावर अभिनेता, डॉक्टर, शिक्षक अशी उत्तरे मिळत होती. या मुलांची स्वप्ने पाहून या मुलांना शक्य तेवढी मदत करायची, असे त्या दिवशी महाविद्यालयातील मुलांनीही ठरवले. मुले टॅक्सीतून उतरल्यावर त्यांना वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शिपाईवर्गातला गावकर मामाही विद्यार्थ्यांना मदत करू लागला. मुलांनी नियमित यावे, यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची,वह्यापुस्तकांची व्यवस्था केली. चांगले खायला मिळते, खेळायला मिळते म्हणून शाळेत न जाणारी बाकीची मुलेही येऊ लागली. आता स्वप्नपूर्ती प्रकल्पामध्ये एकूण वीस मुले-मुली येऊ लागली होती. एखाद्या रविवारी राणीबागेत किंवा जवळच्या नरेपार्क उद्यानात मुलांना खेळायला घेऊन जायचे. शिव्या देणे आणि मस्ती करणे यावर वचक बसणे गरजेचे होते. मग मुलांनीच एकमेकांवर लक्ष ठेवून, अजूनही कोण कोण शिव्या देतात त्यांची नावे रविवारी दादा-ताईंना सांगायची असे ठरले. मस्ती करणाऱ्यांना शिक्षा म्हणून एखादा रविवारी महाविद्यालयात आणायचेच नाही, मग पुढच्या रविवारी तो आपोआप शांत झालेला असायचा. अशा तऱ्हेने शिव्या आणि मस्ती आटोक्यात आणण्यात विद्यार्थ्यांना काही प्रमाणात यश आले.
आपल्या खिशातून रोज एक रुपयाची बचत करून या प्रकल्पासाठी निधी साठवायचा, असे रा.से.यो.च्या विद्यार्थ्यांनी ठरवले. तरीही जमा होणारी रक्कम अपुरी होती. मग महाविद्यालयातील इतर विषयांच्या प्राध्यापकांचे लेक्चर संपल्यावर त्यांना या प्रकल्पाबद्दल सांगायचे आणि शक्य तेवढया मदतीचे आवाहन करायचे, असे ठरवून मुले लेक्चरला बसायला लागली. शिक्षकांना आपले म्हणणे पटवून द्यायला लागली. फक्त शिकण्यासाठी म्हणूनच महाविद्यालयात येणारी ही मुले नाहीत, तर आपल्यासोबत इतरांनीही शिकावे याची यांना जाणीव आहे, म्हणून इतर प्राध्यापकांनीही या प्रकल्पाला शक्य तेवढी मदत केली. स्वप्नपूर्तीच्या विद्यार्थ्यांना या मुलांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत होत्या. या प्रकल्पात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवर सर्व प्राध्यापकांची विशेष नजर होती, ज्यामुळे आपोआपच त्यांचा अभ्यासही होत गेला. स्वप्नपूर्ती प्रकल्पाची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. कॉलेज कँटीन, कट्टा यांवर स्वप्नपूर्तीची चर्चा होऊ लागली. काही जण प्रोत्साहन द्यायचे, तर बरेच जण टिंगलही करायचे. मग 'रविवारी फिरणे, मज्जा करणे, सिनेमा बघणे यात वेळ न घालवता समाजसेवेसाठी तो वेळ देतो' असे स्वप्नपूर्तीचे कार्यकर्ते टिंगल करणाऱ्यांना सांगू लागले.
'स्वप्नपूर्ती' या प्रकल्पाला चार वर्षे उलटून गेली आहेत. या प्रकल्पामध्ये शिवडी, लालबाग-परळ या विभागातील झोपडपट्टीतील मुलांना सहभागी करून घेतले आहे. या प्रकल्पाची सुरुवात करणारा प्रवीण आता तामिळनाडूमध्ये, तर प्रशांत आसाममध्ये सेवाभावी संस्थेसाठी काम करत आहेत. फोनवरून,सामाज माध्यमांद्वारे स्वप्नपूर्ती प्रकल्पाविषयीची माहिती त्यांना मिळत असते. ती माहिती ऐकून नव्या विद्यार्थ्यांचे ते भरभरून कौतुक करतात. त्यांनी लावलेले हे बीज हळूहळू मोठे होत आहे, याचे त्यांना नेहमी समाधान वाटते. हितेश आखाडे हा रा.से.यो. स्वयंसेवक इतर स्वयंसेवकांच्या सोबतीने सध्या स्वप्नपूर्ती प्रकल्प सांभाळत आहे. बाबासाहेब भोसले, हर्षदा गलांडे, वैष्णवी चव्हाण, सौरभ गाडगे, गणेश पवार अशी अनेक मुले दर रविवारी न चुकता एम.डी. महाविद्यालयात येतात.''आम्ही मुलांना काय शिकवतो त्यापेक्षा बऱ्याच चांगल्या गोष्टी मुलांकडून आम्हाला शिकायला मिळतात, आम्हाला आमचे बालपण नव्याने जगायला मिळते'' असे प्रकल्प प्रमुख हितेश आखाडे सांगतो. काळाचौकीच्या महानगरपालिकेच्या शाळेत काही मुलांची नावे नोंदवण्यात आली आहेत. अगोदर शिकत असलेल्या मुलांच्या प्रगतीविषयी वारंवार माहिती घेतली जाते. या अनोख्या, आगळयावेगळया प्रकल्पाला अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळाली आहेत.
एम.डी. महाविद्यालयाप्रमाणेच इतर महाविद्यालयात व काही रहिवासी इमारतींमध्येही असे प्रकल्प सुरू झाले आहेत. देशभरातील, तसेच मुंबईसारख्या शहरातील अनेक मुलांना शिक्षण घेणे शक्य नसते. आजच्या घडीला अनेक मोठमोठया संस्था बालमजूर, बालहक्क अशा गंभीर विषयांवर काम करताना दिसतात, ज्यांना पुरेसा निधी उपलब्ध होतो. मात्र स्वप्नपूर्तीसारखा प्रकल्प आजही विद्यार्थ्यांच्या खिशातील पैशातूनच चालत असतो. पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या विद्यार्थ्यांना मुलांना शिकवण्यातच आनंद मिळतो. स्वप्नपूर्ती प्रकल्पात काम करणारे अनेक विद्यार्थी आजही आजूबाजूच्या परिसरात भीक मागणाऱ्या मुलांना ''कुठे राहतोस, तुला शिकायला आवडेल का?'' असे विचारत असतात.
9773770507

अतिशय छान बातमी आहे
ReplyDelete